सीमांत परिव्यय म्हणजे काय?www.marathihelp.com

सीमांत परिव्यय म्हणजे काय?

वस्तूचे परिमाण नगानगाने वाढविले असता, प्रत्येक वेळी समग्र उत्पादन परिव्ययामध्ये जी वाढ होते, तिला सीमांत उत्पादन परिव्यय असे म्हणतात.

सीमांत सामाजिक उत्पादन परिव्यय आणि सीमांत खाजगी उत्पादन परिव्यय

वस्तूचे उत्पादन करीत असताना त्या वस्तूसाठी कराव्या लागणाऱ्या परिव्ययाचा निर्देश खाजगी उत्पादन परिव्यय म्हणून केला जातो. परंतु असे उत्पादन करीत असताना समाजाला काही आर्थिक हानी पोहोचत असेल, तर त्या हानीचाही समावेश करून त्या वस्तूच्या उत्पादनासाठी होणारा सामाजिक उत्पादन परिव्यय काढला पाहिजे. रेल्वे एंजिनातील ठिणग्यांमुळे आजूबाजूच्या जंगलाची हानी होत असेल, परंतु रेल्वे कंपनीला त्या हानीची भरपाई करावी लागत नसेल, तर रेल्वे कंपनी त्या हानीचा विचार आपल्या उत्पादन परिव्ययाची मोजदाद करताना करणार नाही, असे उदाहरण पिगूने दिले आहे. परंतु रेल्वेमुळे आपल्या एकूण उत्पन्नात किती वाढ झाली, याचा विचार करताना समाजात ही हानीही हिशोबात घेतली पाहिजे. उत्पादन प्रयत्नात बाह्य समाजावर होणारे असे परिणाम हानिकारक असतील, त्याप्रमाणे काही वेळा उपकारकही असू शकतील. सामाजिक उत्पादन परिव्ययाचा हिशोब करताना, खाजगी परिव्ययात त्या दृष्टीने आवश्यक ती वजावट वा बेरीज करणे आवश्यक असते.

पिगूच्या मते समाजाच्या अधिकतम कल्याणासाठी वस्तु परिमाणाच्या सीमांत सामाजिक उत्पादन परिव्ययाची त्याच्या सीमांत खाजगी उत्पादन परिव्ययाशी बरोबरी झाली पाहिजे. म्हणजे साधनसामग्रीच्या सीमांत सामाजिक वट्ट फळाची आणि तिच्या सीमांत खाजगी वट्ट फळाची बरोबरी झाली पाहिजे आणि सर्व उद्योगधंद्यांत व सर्व ठिकाणी साधन-सामग्रीचे सीमांत सामाजिक वट्ट फळ सारखे झाले पाहिजे. यासाठी सीमांत सामाजिक उत्पादन परिव्यय सीमांत खाजगी उत्पादन परिव्ययापेक्षा अधिक असल्यास, समाजाला पोहोचणारी हानी व तिचा समाजावरील भार दूर करण्याच्या दृष्टीने सरकारने दक्षता घेणे आवश्यक असते. जमीनमालकांचा एक वर्ग व जमीन करणाऱ्यांचा दुसरा वर्ग यांच्या अस्तित्वामुळे अशा प्रकारची तफावत शेतीव्यवसायामध्ये निर्माण होते. म्हणून ‘कसेल त्याची जमीन’ या भूमीधारणाकायद्याचे पिगूने प्रतिपादन केले. तसेच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरांची लोकवस्ती वाढून, शहरांना बकाली स्वरूप प्राप्त होते; शहरांची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे सामाजिक आरोग्याला धोका पोहोचतो. त्यामुळे सीमांत सामाजिक वट्ट फळ आणि सीमांत खाजगी वट्ट फळ यांमध्ये तफावत होते. ती तफावत नष्ट करण्यासाठी औद्योगिक विकेंद्रीकरणासारखे काही निश्चित उपाय सुचविण्यात येतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:34 ( 1 year ago) 5 Answer 7257 +22