मराठ्यांचा अध्याय इतिहासकार कोण?www.marathihelp.com

मराठ्यांचा अध्याय इतिहासकार कोण?
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; - ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

मराठ्यांचे राज्य इंग्रजांनी १८१८ मध्ये जिंकून घेतले. पेशवे आणि त्यांची जुनी राजवट जाऊन नवे इंग्रजी शासन आले. इंग्रजी राज्यकर्त्यानी नव्या पद्धतीचे शिक्षण सुरू केले. नव्या विद्येबरोबर मराठी समाजात नवे विचार, नव्या समजुती रूजू लागल्या. अठराव्या शतकात बखरवाङ्‌मय विपुल प्रमाणात निर्माण झाले होते. त्यापैकी बरेच काव्येतिहाससंग्रहात १८८० ते १८८२ च्या दरम्यान प्रकाशित झाले व काही विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नाशीत प्रकाशित झाले. तथापि नव्या शिक्षित समाजाचे बखरवजा लिखाणाने समाधान होण्यासारखे नव्हते; पण अर्वाचीन चिकित्सक इतिहास लेखनाचीही त्याची अद्याप तयारी झाली नव्हती. बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ दाजी लाड यांनी प्राचीन कालातील काही ताम्रशिला – शासनांचे वाचन केले, त्यांवर टिपणे लिहिली; पण हे अपवादात्मक कार्य होते. शिवाय या त्रोटक माहितीवर महाराष्ट्राचा प्राचीन इतिहासही लिहिता येण्यासारखा नव्हता.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र मराठ्यांच्या इतिहासाचा शोध सुरू केला. पुणे दरबारी असलेला इंग्रज वकील मॅलेट याने कित्येकदा आपल्या पत्रांत आपण मराठ्यांचा इतिहास लिहिण्यास घेतला आहे, असा उल्लेख केलेला आहे. मॅलेटचा मराठ्यांचा इतिहास तयार झाला नाही; तथापि १७८१ मध्ये एक जर्मन संशोधक श्प्रेंगेल आणि १८१० मध्ये स्कॉट वेअरिंग या दोघांनी मराठ्यांचे उणेअधिक पुरेअपुरे इतिहास प्रसिद्ध केले. महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात जाताच एल्फिन्स्टनने ऑन द टेरिटरीज कॉकर्ड फ्रॉम द पेशवाज हे पुस्तक लिहिले. हे मराठ्यांच्या तत्कालीन सर्वागीण इतिहासाचा सारांश आहे. यापेक्षा अधिक प्रामाण्य मिळविणारा इतिहास १८२६ मध्ये प्रसिद्ध झाला. तो म्हणजे ग्रँट डफ याने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास होय. डेव्हिड केपेन ह्याने इतिहासाचे मराठी भाषांतर बखर मराठ्यांची ह्या नावने केले आहे (१८३०).

डफ हा सातारा दरबारी १८१८ मध्ये नेमलेला पहिला इंग्रज रेसिडेंट. सातारचे राजे प्रतापसिंह यांच्या शिक्षणावर व कार्यावर देखरेख ठेवून त्यांच्या मार्फत सातारा संस्थानाचे राज्य चालवावयाचे हे रेसिडेंटचे काम. हे काम करताना पूर्वीची पद्धत कशी होती याची विचारपूस डफ करू लागला आणि त्यातून त्याच्या इतिहासलेखनाची सुरूवात झाली. सातारकर राजे, त्यांचे चिटणीस, दरबारातील मानकरी, बाळाजीपंत नातू इत्यादीकडून डफने अगदी कसोशीने आणि चिकाटीने माहिती जमा केली, बखरी मिळविल्या, काही फार्सी- मराठी कागदपत्र मिळविले. दरबारी मंडळीकडून डफ कसोशीने माहिती जमा करी. सुमारे अर्ध शतक डफकृत मराठ्यांचा इतिहास हा प्रमाणभूत म्हणून सर्वजण मानत आले.

डफच्या इतिहासापासून महाराष्ट्रात इतिहाससंशोधननास सुरूवात झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७ मध्ये झाली. नवविद्येचा प्रसार समाजात होऊ लागला, समाजातील काही घटकांना नवीन दृष्टी प्राप्त झाली. देशाभिमानाचे वारे वाहू लागले तसे आमच्या भूतकालाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहिले पाहिजे, अशी जाणीवही निर्माण झाली.डफच्या इतिहासात मराठ्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्‍न केला आहे. पण ह्या इतिहासककथनातही कित्येक वेळा त्याने मराठ्यांना प्रतिकूल व अनैतिहासिक अशी विधाने केली आहेत. सर्वसाधारण मराठ्यांना व मराठा राज्यसंस्थापक शिवाजी महाराजांना डफने नावे ठेविली. त्यामुळे त्याच्या इतिहासाबद्दल मराठी मनात अढी निर्माण झाली.

नीलकंठ जनार्दन कीर्तने ह्यांनी ग्रांट डफकृत मराठ्यांच्या बखरीवर टीका (१८६८) ह्या निबंधात डफच्या इतिहासग्रंथातील उणिवा दाखवून दिल्या. डफने कालविपर्यास केला आहे आणि त्याचे निरूपण काही ठिकाणी अपुरे, चुकीचे व मराठेविरोधी आहे, असा या टीकेचा रोख होता. कीर्तन्यांचा आवाज एकाकी नव्हता. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी लिहून ठेवले. की डफच्या इतिहासातील राजकारणी इतिहास चुकीचा आहे आणि त्यात मराठ्यांचा धर्म, कला, विद्या, वाड्‍मय, चालीरीती यासंबंधीची माहिती अगदी जुजबी आहे. त्यांनी मागणी केली, की मराठ्यांचा समग्र, शास्त्रशुद्ध इतिहास नव्याने लिहिला पाहिजे.

जनार्दन बाळाजी मोडक आणि काशीनाथ नारायण साने ह्यांनी काव्येतिहाससंग्रह हे मासिक १८७८ मध्ये काढले होते. देशसेवेच्या दृष्टिकोणातून इतिहास, बखरी आदी जुन्या ग्रंथपत्रांचा जीर्णोद्धार करणे हे ह्या मासिकाचे उद्दिष्ट होते. अकरा वर्षानी काव्येतिहाससंग्रह मासिकाचे प्रकाशन थांबले; पण मासिकाने दाखवून दिले, की इतिहास- लेखनास आवश्यक अशी साधने- समकालीन कागदपत्रे, कैफियती, नाणी, कोरीव लेख, जुने स्थापत्य, जुनी भांडी, चित्रे इ. – महाराष्ट्रात विखुरलेली आहेत. ती उजेडात आणण्याचा खटाटोप अभ्यासकांनी केला पाहिजे. पाश्चात्य संशोधकांनी समकालीन कागदपत्रांच्या शोधा करता घेतलेल्या परिश्रमांची वि. का. राजवाडे यांच्यावर विशेष छाप पडली.

जुन्या कागदपत्रांचा त्यांना ध्यास लागला. कागदपत्रे नाहीत तर इतिहासलेखन शक्य नाही. अशा आशयाचे उद्‍गार फ्रेंच कवी आणि मुत्सद्दी लामातींन ह्याने काढले आहेत. त्यांचा त्यांनी सर्वार्थाने स्वीकार केला. विश्वसनीय अस्सल इतिहाससाधने शोधून काढून आणि त्यांचे संपादन करून ती प्रसिद्ध करण्याच्या कार्याला त्यांनी आपले आयुष्यच वाहुन घेतले. त्यांच्या सुदैवाने पेशव्यांनी उत्तरेस पाठविलेल्या येरंडे व कानिटकर या अधिकाऱ्यांचे दप्तर त्यांच्या वाई येथील मित्रांच्या मध्यस्थीने त्यांच्या हाती लागले. राजवाड्यांनी सर्व दप्तर वाचून काढले. त्यातील १७५० – ६१ या अकरा वर्षातील हिंदुस्थानातील हालचाली देणाऱ्या ३०४ पत्रांचा एक भाग १८९८ मध्ये त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने, पहिला खंड म्हणून प्रसिद्ध केला.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5718 +22